Sunday 30 November 2014

ऑनलाईन पुस्तक प्रकाशन कसे कराल

                    आज काल तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. बरेच जन वर्तमानपत्र देखील विकत न घेता ते इन्टरनेट वर ऑनलाईन वाचतात. इंटरनेट हि वरचेवर सहज, सोपे व सुलभ झाले आहे अश्या काळात आपण जर तंत्रज्ञान आणि इंटरनेट पासून दूर राहिलो तर आपण जगाच्या मागे राहू आणि पर्यायाने आपण काळाबरोबर चालू शकणार नाही. शिक्षकांना तर हे फार जरुरी आहे कारण ज्यांच्या आजूबाजूला तंत्रज्ञानावर आधारित खेळणी आहेत अश्या स्मार्त पिढीसमोर आपण उभे राहणार आहोत तेंव्हा आपणास मागे राहून कसे चालेल. 
                     आज आपल्यातील बरेच शिक्षक त्यांचे अनुभव, नवीन प्रयोग, विविध उपक्रम पुस्तक रूपाने प्रकाशित करत आहेत. छापील पुस्तक तयार करून ते प्रकाशित करणे हे महत्वाचे आहेच. शिवाय हे पुस्तक ऑनलाईन प्रकाशित करणे हेदेखील महत्वाचे आहे. 

पुस्तक ऑनलाईन प्रकाशन करण्याचे माझ्या दृष्टीने काही फायदे : 
१) पुस्तक तयार करणे फार सोपे असते. 
२) प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांची ओळख असणे त्यांच्याकडे सतत चकरा मारणे हा त्रास वाचतो. 
३) छापील पुस्तकापेक्षा अत्यल्प खर्चात पुस्तक तयार होते 
४) बर्याचदा पुस्तक pdf किंवा e-book या प्रकारात रुपांतरीत करण्याचे काम प्रकाशक स्वतःच करतात 
५) पुस्तक विक्री झाले कि पैसे आपोआप आपल्या खात्यावर जमा होतात. 
६) आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पुस्तक कमी कालावधीत अनेक लोकांपर्यंत सहजासहजी पोहचते.

आपण जर लेखक असाल, एखादे पुस्तक लिहिले असेल किंवा लिहिण्याचा आपला विचार असेल तर आपण ते पुस्तक ई बुक म्हणून नक्कीच प्रकाशित करा. यासाठी सध्या जास्तीत जास्त लोकप्रिय असलेली आणि मराठी वाचक पुस्तक खरेदीसाठी प्राधान्य देत असलेली वेबसाईट म्हणजे http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?LID=5185639334973501534 हो या वेबसाईट ने आपल्या मराठी पुस्तकांसाठी भले मोठे दालन उपलब्ध करून दिले आहे 

या वेबसाईट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा http://www.bookganga.com/eBooks

या वेबसाईट वर आपले पुस्तक प्रकाशित करणे फार सोपे आहे. आपण आपले छापील पुस्तक किंवा pdf नमुन्यातील पुस्तक या साईट च्या कार्यालयात फक्त जमा करायचे आहे. या पुस्तकाचे ई बुक भाषेत रुपांतर व प्रकाशन बुक गंगा मार्फत केले जाते. 

पुस्तक जमा करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता :
MyVishwa Technologies Pvt. Ltd.
16, Sawali, Panmala, Off Sinhagad Road,
Behind COSMOS Bank,
Pune-411030, Maharashtra, India.
Contact : M : (91) - 8600 751110 / (91) - 8600 761110 / T : +91-20-24 52 52 
Timings: 10.00 AM to 6.30 PM (IST)     (Monday to Saturday)
8.00 AM - 3.00 PM (IST)      (Sunday) 
सध्या मराठी वाचकांचा हि ओढ ई पुस्तके घेण्याकडे लागला आहे. त्यामुळे मराठी लेखकांनीही ई पुस्तके प्रकशित करावीत त्यांचे नक्कीच स्वागत होईल. यात शंका नाही. ई बुक्स आणि इंटरनेट चा वाढता वापर पाहता आणि  या नवीन मोबईल युगात नवीन पिढीने स्वीकारलेली नवीन वाचन शैली पाहता प्रकाशकांनी व नवोदित लेखकांनी हि शैली नक्कीच आत्मसात करावी असे वाटते....
याशिवाय आपण आपले पुस्तक Flipkart., Google.com, आणि amezon.com या वेबसाईट वर देखील प्रकाशित करू शकता ते कसे करावे हे पुढील लेखात पाहू....

Saturday 29 November 2014

बालाजी जाधव प्राथमिक शिक्षणाला नवी उंची मिळवून देणारा शिक्षक

                 बालाजी जाधव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगावी या गावचा हा तरुण, बारावी झाल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलेला एक तरुण मुलगा परंतु अचानक आपण प्राथमिक शिक्षक व्हावे असे ठरवून डी. एड. करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (म्हसवड ) तालुका माण जिल्हा सातारा या शाळेत २००६ साली हा तरुण प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाला. हि शाळा ग्रामीण भागातील आणि द्विशिक्षकी असली तरी हाकेच्या अंतरावर तालुक्यातील सर्वात चांगली म्हणून ओळखली जाणारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. परंतु पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपली मुलं न घालता ती शिंदेवस्ती या शाळेत दाखल होऊ लागली कारण त्या शाळेच्या तुलनेत हि शाळा कोठेही कमी पडत नव्हती. या शाळेतील मुलेही इंग्रजीत संवाद साधत होती. त्यामुळे पालकांचा या शाळेवरील आणि पर्यायाने बालाजी जाधव या शिक्षकावरील विश्वास सार्थ आणि दृढ होत चालला होता. या शाळेत इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण घेऊन मुले ५ वी साठी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात यावरून आपण शाळेची गुणवत्ता समजू शकतो. 

                         आपल्या शाळेतील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत नुसती पास न होता ती शिष्यवृत्तीधारक कशी होतील यासाठी या तरुणाने खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणजे या शाळेतील एकतरी विध्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती धारक असतोच असतो... शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणाऱ्या भरपूर युक्त्या आणि क्लृप्त्या या शिक्षकाने शोधून काढल्या सरावासाठी अनेक प्रश्नपत्रिकांची निर्मिती त्याने केली. बालाजी हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांबरोबरच आपल्या केंद्रातील विद्यार्थीही शिष्यवृत्तीधारक झाले पाहिजेत या उद्देश्याने केंद्रातील सर्व शाळांतील हुशार विद्यार्थी निवडून त्यांनाही मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि या कामातही त्याला अपेक्षित यश संपादन करता आले. हळू हळू ४ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून बालाजी जाधव याचे तालुक्यात नाव झाले. यानंतर तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आल्यानंतर त्या परीक्षेचे सर्व विषयाचे सराव पेपर तयार करण्याचे काम अर्थात बालाजी जाधव याच्याकडेच देण्यात आले.
                          हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. ठरवून शिक्षण क्षेत्रात आलेला आणि प्राथमिक शिक्षणात काहीतरी मोठे काम करण्याचा मानस असलेला हा तरुण शिक्षक एवढ्यावर थांबने शक्य नव्हते आपल्या ज्ञान व कौशल्याचा वापर महाराष्ट्रातील इतर शिक्षकांना व्हावा या उद्देशाने या शिक्षकाने स्वतःचा crcmhaswadno3.blogspot.in या नावाने एक blog तयार करून त्याद्वारे शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन, समस्या निराकरण, सूत्रे, युक्या, क्लृप्त्या, सरावासाठी प्रश्न तसेच online व offline टेस्ट इत्यादी... असा एक शिष्यवृत्ती संदर्भात ई खजिनाच सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी खुला करून दिला. यासाठी त्याने कोणतेही शुल्क घेतले नाही हे विशेष. प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व विध्यार्थानिसाठीची तळमळ असणारा शिक्षकच एव्हडे मोठे काम निशुल्क करू शकतो.
  
                        यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या शिक्षण विकास मंचने यावर्षीचा सर्वोत्कुष्ट शैक्षणिक blog म्हणून या ब्लॉगचा सन्मान केला आहे. आणि तो खरोखरच योग्य आहे. हा पुरस्कार मिळाल्यापासून बर्याच शिक्षक मित्रांनी फोन करून whats up आणि मेसेज करून मलाही शुभेच्छा दिल्यात (अगदी मी हा लेख लिहित असतानाही मला दोन फोन आलेत) आणि त्या मी स्वीकारल्या कारण मित्राचा सन्मान म्हणजे माझाही सन्मानच नाही का ? हो बालाजी आणि मी चांगले मित्र आहोत आणि बर्याचदा अनेक कार्यक्रमानमध्ये आणि कार्यशाळेमध्ये आम्ही सोबत असतो पण मी नम्रतापूर्वक इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो कि crcmhaswadno3.blogspot.in या blog च्या यशामध्ये बालाजीने crcmardi.blogspot.in या blog पासून घेतलेली प्रेरणा याव्यातिरिक्त माझा कसलाही वाटा नाही. या ब्लॉगच्या यशासाठी बालाजीने अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.
                            तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात मन लाऊन काम करा एके दिवशी तुम्ही त्या क्षेत्रात शिवाजी महाराज असाल या मानसिकतेने काम करणारा अत्यंत मेहनती आणि सतत नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या या धडपड्या शिक्षक मित्राचा मला सतत अभिमान वाटतो...

Friday 28 November 2014

आनंदवन विषयी थोडसं.....

            
      आनंदवन ही कथा आहे एका जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या तरुण व काहीतरी करू पाहणाऱ्या धडपड्या शिक्षकाची...यात नाट्य नाही. पण अनुभव जरूर आहेत.एकट्याने एखादे काम करताना येणाऱ्या अडचणी काय असतात तसेच मोडून पडण्याचे क्षण कसे असतात हे यात अनुभवायला मिळेल. तसेच मार्ग शोधताना होणारी घुसमट,त्रास अन त्याचसोबत मित्रांची साथ हे सर्व ही अनुभवायला मिळेल.असं एकटं असताना मनात नकारात्मकता भरणं साहजिक आहे. कारण ती स्वाभाविक मानसिकता आहे. पण हीच नकारात्मकता माणसाला काम व आवड या दोन्हीपासून दूर नेते.आनंदवनमध्ये सकारात्मक विचार आपली सर्जन व सृजनशीलता कशी फुलवते याचा अनुभव घ्याल.
       सरकारी शाळातून चालणारे प्रयत्न लोकापर्यंत पोचत नाहीत.कारण आपण जे करतोय किंवा करून पाहिलंय हे तितकसं महत्त्वाचं नाहीय असंच वाटत राहतं. आनंदवन अशाच प्रयत्नांची कहाणी आहे. यात सोपे सोपे प्रयोग आहेत त्यासोबतच प्रेरणाही आहे. यात असलेला शिक्षक मंजे दुसरं तिसरं कुणी नसून आपणच आहोत, असाच अनुभव येईल.सरकारी शाळांनी समाजातील अनेक पिढ्यांना घडवलंय.मात्र आता अचानक या शाळाविषयी इतका अविश्वास का निर्माण झाला? याचं उत्तर आपण सर्वांनी शोधून काढायचंय. आनंदवन सरकारी शाळेचं व व्यवस्थेच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आलेल्या शिक्षकाच्या घुसमटीचीही कहाणी आहे. काही तरी करून दाखवण्याची धमक सर्वांत आहे. पण परिस्थिती अनुकूल नसते.चुकून शाबासकीही वाट्याला येत नाही.तरी कुणाला दोष न देता आपली अंत:प्रेरणा कायम ठेऊन काम करत राहणाऱ्या व आपल्या सोबत सर्वांना नेऊ पाहणाऱ्या एका शिक्षकाची ही कथा.


         सरकारी शाळांचं अस्तित्व कायम राहणार आहे.यात वाद नाही.पण त्यासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा आहे.त्याशिवाय सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा समाजाच्या विकासात आपला वाटा उचलू शकणार नाहीत. अमेरिकेचं येता जाता अनुकरण करणारे आपण हे विसरतो की तिथं सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं.आपल्याकडील चित्र उलट आहे.आपल्याकडे सरकारी शाळा ह्या हलक्या समजल्या जातात.एकदा या शाळांवर विश्वास ठेऊन पाहूया. त्या केवळ गरीबांच्या नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तराला सामाऊन घेणाऱ्या समाजाच्या “आई” आहेत.ही त्या आईची कहाणी आहे.“मराठी शाळा कशी आपल्या जीवनविश्वाचा भाग असते हे चित्र इथे पाहायला मिळते.” इथे स्वप्नं आहेत.धड-पडणं आहे.

       भाऊसाहेब चासकर या धडपड्या शिलेदार शिक्षकाची प्रस्तावना,एकनाथ गुरव या हरहुन्नरी शिक्षकाचं प्रकाशकपण, तसेच इ. 2 रीच्या पाठ्यपुस्तकात ज्यांचा “मला वाटते” हा पाठ समाविष्ट आहे त्या फारूक काझी या शिक्षकाचं अनुभव कथन हे या पुस्तकाचं आणखी एक विशेष.

          जे कुणी लिहित नाही ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय.त्यातले काही अनुभव खूप साधे..... छोटे .... बाळबोध वाटतील ....पण खरं सांगू आयुष्यातले असे छोटे छोटे प्रसंगच तुम्हाला मोठं व्हायला मदत करतात .हे अनुभव मी माझ्या वर्गात करून पाहिलेल्या प्रयोगांचे आहेत. ते साधे असतील पण त्यामागील हेतू मात्र साधे नाहीत हे आपण समजून घ्याल अशी अपेक्ष करतो......
          हे शिकण्याच्या वाटेवरच आनंदवनवाचत असताना प्रत्येकजण स्वतःला शोधत राहील. त्याला वाटेल अरे यार मी हे करून पाहिलंय .......this is me..... तिथच या लेखनाचं सार्थक होईल.प्रत्येक शिक्षक नवीन स्वप्नं घेऊन काम करायला सुरुवात करतो.व्यवस्थेची उतरंड वाईट असली तरी स्वतःची स्वप्नं गाडू द्यायची नाहीत ....आपण थांबायचं नाही ......ही अंत:प्रेरणा त्याला सतत जिवंत ठेवत असते . 
                                                                                 संवाद ...लेखकाचे मनोगत मधून.     

   
                                     पुस्तकाचे नाव : शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”
                                      लेखक :                      फारूक एस. काझी.
                                      प्रस्तावना :                     भाऊसाहेब चासकर.
                                      प्रकाशक:                               एकनाथ गुरव.
 “अंकुर” गट. सांगोला.
                                                   जिल्हा :                                      सोलापूर.
                                      किंमत:                                 १२०/- रु.