Sunday, 30 November 2014

ऑनलाईन पुस्तक प्रकाशन कसे कराल

                    आज काल तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. बरेच जन वर्तमानपत्र देखील विकत न घेता ते इन्टरनेट वर ऑनलाईन वाचतात. इंटरनेट हि वरचेवर सहज, सोपे व सुलभ झाले आहे अश्या काळात आपण जर तंत्रज्ञान आणि इंटरनेट पासून दूर राहिलो तर आपण जगाच्या मागे राहू आणि पर्यायाने आपण काळाबरोबर चालू शकणार नाही. शिक्षकांना तर हे फार जरुरी आहे कारण ज्यांच्या आजूबाजूला तंत्रज्ञानावर आधारित खेळणी आहेत अश्या स्मार्त पिढीसमोर आपण उभे राहणार आहोत तेंव्हा आपणास मागे राहून कसे चालेल. 
                     आज आपल्यातील बरेच शिक्षक त्यांचे अनुभव, नवीन प्रयोग, विविध उपक्रम पुस्तक रूपाने प्रकाशित करत आहेत. छापील पुस्तक तयार करून ते प्रकाशित करणे हे महत्वाचे आहेच. शिवाय हे पुस्तक ऑनलाईन प्रकाशित करणे हेदेखील महत्वाचे आहे. 

पुस्तक ऑनलाईन प्रकाशन करण्याचे माझ्या दृष्टीने काही फायदे : 
१) पुस्तक तयार करणे फार सोपे असते. 
२) प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांची ओळख असणे त्यांच्याकडे सतत चकरा मारणे हा त्रास वाचतो. 
३) छापील पुस्तकापेक्षा अत्यल्प खर्चात पुस्तक तयार होते 
४) बर्याचदा पुस्तक pdf किंवा e-book या प्रकारात रुपांतरीत करण्याचे काम प्रकाशक स्वतःच करतात 
५) पुस्तक विक्री झाले कि पैसे आपोआप आपल्या खात्यावर जमा होतात. 
६) आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पुस्तक कमी कालावधीत अनेक लोकांपर्यंत सहजासहजी पोहचते.

आपण जर लेखक असाल, एखादे पुस्तक लिहिले असेल किंवा लिहिण्याचा आपला विचार असेल तर आपण ते पुस्तक ई बुक म्हणून नक्कीच प्रकाशित करा. यासाठी सध्या जास्तीत जास्त लोकप्रिय असलेली आणि मराठी वाचक पुस्तक खरेदीसाठी प्राधान्य देत असलेली वेबसाईट म्हणजे http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?LID=5185639334973501534 हो या वेबसाईट ने आपल्या मराठी पुस्तकांसाठी भले मोठे दालन उपलब्ध करून दिले आहे 

या वेबसाईट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा http://www.bookganga.com/eBooks

या वेबसाईट वर आपले पुस्तक प्रकाशित करणे फार सोपे आहे. आपण आपले छापील पुस्तक किंवा pdf नमुन्यातील पुस्तक या साईट च्या कार्यालयात फक्त जमा करायचे आहे. या पुस्तकाचे ई बुक भाषेत रुपांतर व प्रकाशन बुक गंगा मार्फत केले जाते. 

पुस्तक जमा करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता :
MyVishwa Technologies Pvt. Ltd.
16, Sawali, Panmala, Off Sinhagad Road,
Behind COSMOS Bank,
Pune-411030, Maharashtra, India.
Contact : M : (91) - 8600 751110 / (91) - 8600 761110 / T : +91-20-24 52 52 
Timings: 10.00 AM to 6.30 PM (IST)     (Monday to Saturday)
8.00 AM - 3.00 PM (IST)      (Sunday) 
सध्या मराठी वाचकांचा हि ओढ ई पुस्तके घेण्याकडे लागला आहे. त्यामुळे मराठी लेखकांनीही ई पुस्तके प्रकशित करावीत त्यांचे नक्कीच स्वागत होईल. यात शंका नाही. ई बुक्स आणि इंटरनेट चा वाढता वापर पाहता आणि  या नवीन मोबईल युगात नवीन पिढीने स्वीकारलेली नवीन वाचन शैली पाहता प्रकाशकांनी व नवोदित लेखकांनी हि शैली नक्कीच आत्मसात करावी असे वाटते....
याशिवाय आपण आपले पुस्तक Flipkart., Google.com, आणि amezon.com या वेबसाईट वर देखील प्रकाशित करू शकता ते कसे करावे हे पुढील लेखात पाहू....

Saturday, 29 November 2014

बालाजी जाधव प्राथमिक शिक्षणाला नवी उंची मिळवून देणारा शिक्षक

                 बालाजी जाधव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगावी या गावचा हा तरुण, बारावी झाल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलेला एक तरुण मुलगा परंतु अचानक आपण प्राथमिक शिक्षक व्हावे असे ठरवून डी. एड. करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (म्हसवड ) तालुका माण जिल्हा सातारा या शाळेत २००६ साली हा तरुण प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाला. हि शाळा ग्रामीण भागातील आणि द्विशिक्षकी असली तरी हाकेच्या अंतरावर तालुक्यातील सर्वात चांगली म्हणून ओळखली जाणारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. परंतु पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपली मुलं न घालता ती शिंदेवस्ती या शाळेत दाखल होऊ लागली कारण त्या शाळेच्या तुलनेत हि शाळा कोठेही कमी पडत नव्हती. या शाळेतील मुलेही इंग्रजीत संवाद साधत होती. त्यामुळे पालकांचा या शाळेवरील आणि पर्यायाने बालाजी जाधव या शिक्षकावरील विश्वास सार्थ आणि दृढ होत चालला होता. या शाळेत इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण घेऊन मुले ५ वी साठी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात यावरून आपण शाळेची गुणवत्ता समजू शकतो. 

                         आपल्या शाळेतील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत नुसती पास न होता ती शिष्यवृत्तीधारक कशी होतील यासाठी या तरुणाने खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणजे या शाळेतील एकतरी विध्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती धारक असतोच असतो... शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणाऱ्या भरपूर युक्त्या आणि क्लृप्त्या या शिक्षकाने शोधून काढल्या सरावासाठी अनेक प्रश्नपत्रिकांची निर्मिती त्याने केली. बालाजी हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांबरोबरच आपल्या केंद्रातील विद्यार्थीही शिष्यवृत्तीधारक झाले पाहिजेत या उद्देश्याने केंद्रातील सर्व शाळांतील हुशार विद्यार्थी निवडून त्यांनाही मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि या कामातही त्याला अपेक्षित यश संपादन करता आले. हळू हळू ४ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून बालाजी जाधव याचे तालुक्यात नाव झाले. यानंतर तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आल्यानंतर त्या परीक्षेचे सर्व विषयाचे सराव पेपर तयार करण्याचे काम अर्थात बालाजी जाधव याच्याकडेच देण्यात आले.
                          हा धडपड्या शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. ठरवून शिक्षण क्षेत्रात आलेला आणि प्राथमिक शिक्षणात काहीतरी मोठे काम करण्याचा मानस असलेला हा तरुण शिक्षक एवढ्यावर थांबने शक्य नव्हते आपल्या ज्ञान व कौशल्याचा वापर महाराष्ट्रातील इतर शिक्षकांना व्हावा या उद्देशाने या शिक्षकाने स्वतःचा crcmhaswadno3.blogspot.in या नावाने एक blog तयार करून त्याद्वारे शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन, समस्या निराकरण, सूत्रे, युक्या, क्लृप्त्या, सरावासाठी प्रश्न तसेच online व offline टेस्ट इत्यादी... असा एक शिष्यवृत्ती संदर्भात ई खजिनाच सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी खुला करून दिला. यासाठी त्याने कोणतेही शुल्क घेतले नाही हे विशेष. प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व विध्यार्थानिसाठीची तळमळ असणारा शिक्षकच एव्हडे मोठे काम निशुल्क करू शकतो.
  
                        यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या शिक्षण विकास मंचने यावर्षीचा सर्वोत्कुष्ट शैक्षणिक blog म्हणून या ब्लॉगचा सन्मान केला आहे. आणि तो खरोखरच योग्य आहे. हा पुरस्कार मिळाल्यापासून बर्याच शिक्षक मित्रांनी फोन करून whats up आणि मेसेज करून मलाही शुभेच्छा दिल्यात (अगदी मी हा लेख लिहित असतानाही मला दोन फोन आलेत) आणि त्या मी स्वीकारल्या कारण मित्राचा सन्मान म्हणजे माझाही सन्मानच नाही का ? हो बालाजी आणि मी चांगले मित्र आहोत आणि बर्याचदा अनेक कार्यक्रमानमध्ये आणि कार्यशाळेमध्ये आम्ही सोबत असतो पण मी नम्रतापूर्वक इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो कि crcmhaswadno3.blogspot.in या blog च्या यशामध्ये बालाजीने crcmardi.blogspot.in या blog पासून घेतलेली प्रेरणा याव्यातिरिक्त माझा कसलाही वाटा नाही. या ब्लॉगच्या यशासाठी बालाजीने अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.
                            तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात मन लाऊन काम करा एके दिवशी तुम्ही त्या क्षेत्रात शिवाजी महाराज असाल या मानसिकतेने काम करणारा अत्यंत मेहनती आणि सतत नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या या धडपड्या शिक्षक मित्राचा मला सतत अभिमान वाटतो...

Friday, 28 November 2014

आनंदवन विषयी थोडसं.....

            
      आनंदवन ही कथा आहे एका जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या तरुण व काहीतरी करू पाहणाऱ्या धडपड्या शिक्षकाची...यात नाट्य नाही. पण अनुभव जरूर आहेत.एकट्याने एखादे काम करताना येणाऱ्या अडचणी काय असतात तसेच मोडून पडण्याचे क्षण कसे असतात हे यात अनुभवायला मिळेल. तसेच मार्ग शोधताना होणारी घुसमट,त्रास अन त्याचसोबत मित्रांची साथ हे सर्व ही अनुभवायला मिळेल.असं एकटं असताना मनात नकारात्मकता भरणं साहजिक आहे. कारण ती स्वाभाविक मानसिकता आहे. पण हीच नकारात्मकता माणसाला काम व आवड या दोन्हीपासून दूर नेते.आनंदवनमध्ये सकारात्मक विचार आपली सर्जन व सृजनशीलता कशी फुलवते याचा अनुभव घ्याल.
       सरकारी शाळातून चालणारे प्रयत्न लोकापर्यंत पोचत नाहीत.कारण आपण जे करतोय किंवा करून पाहिलंय हे तितकसं महत्त्वाचं नाहीय असंच वाटत राहतं. आनंदवन अशाच प्रयत्नांची कहाणी आहे. यात सोपे सोपे प्रयोग आहेत त्यासोबतच प्रेरणाही आहे. यात असलेला शिक्षक मंजे दुसरं तिसरं कुणी नसून आपणच आहोत, असाच अनुभव येईल.सरकारी शाळांनी समाजातील अनेक पिढ्यांना घडवलंय.मात्र आता अचानक या शाळाविषयी इतका अविश्वास का निर्माण झाला? याचं उत्तर आपण सर्वांनी शोधून काढायचंय. आनंदवन सरकारी शाळेचं व व्यवस्थेच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आलेल्या शिक्षकाच्या घुसमटीचीही कहाणी आहे. काही तरी करून दाखवण्याची धमक सर्वांत आहे. पण परिस्थिती अनुकूल नसते.चुकून शाबासकीही वाट्याला येत नाही.तरी कुणाला दोष न देता आपली अंत:प्रेरणा कायम ठेऊन काम करत राहणाऱ्या व आपल्या सोबत सर्वांना नेऊ पाहणाऱ्या एका शिक्षकाची ही कथा.


         सरकारी शाळांचं अस्तित्व कायम राहणार आहे.यात वाद नाही.पण त्यासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा आहे.त्याशिवाय सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा समाजाच्या विकासात आपला वाटा उचलू शकणार नाहीत. अमेरिकेचं येता जाता अनुकरण करणारे आपण हे विसरतो की तिथं सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं.आपल्याकडील चित्र उलट आहे.आपल्याकडे सरकारी शाळा ह्या हलक्या समजल्या जातात.एकदा या शाळांवर विश्वास ठेऊन पाहूया. त्या केवळ गरीबांच्या नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तराला सामाऊन घेणाऱ्या समाजाच्या “आई” आहेत.ही त्या आईची कहाणी आहे.“मराठी शाळा कशी आपल्या जीवनविश्वाचा भाग असते हे चित्र इथे पाहायला मिळते.” इथे स्वप्नं आहेत.धड-पडणं आहे.

       भाऊसाहेब चासकर या धडपड्या शिलेदार शिक्षकाची प्रस्तावना,एकनाथ गुरव या हरहुन्नरी शिक्षकाचं प्रकाशकपण, तसेच इ. 2 रीच्या पाठ्यपुस्तकात ज्यांचा “मला वाटते” हा पाठ समाविष्ट आहे त्या फारूक काझी या शिक्षकाचं अनुभव कथन हे या पुस्तकाचं आणखी एक विशेष.

          जे कुणी लिहित नाही ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय.त्यातले काही अनुभव खूप साधे..... छोटे .... बाळबोध वाटतील ....पण खरं सांगू आयुष्यातले असे छोटे छोटे प्रसंगच तुम्हाला मोठं व्हायला मदत करतात .हे अनुभव मी माझ्या वर्गात करून पाहिलेल्या प्रयोगांचे आहेत. ते साधे असतील पण त्यामागील हेतू मात्र साधे नाहीत हे आपण समजून घ्याल अशी अपेक्ष करतो......
          हे शिकण्याच्या वाटेवरच आनंदवनवाचत असताना प्रत्येकजण स्वतःला शोधत राहील. त्याला वाटेल अरे यार मी हे करून पाहिलंय .......this is me..... तिथच या लेखनाचं सार्थक होईल.प्रत्येक शिक्षक नवीन स्वप्नं घेऊन काम करायला सुरुवात करतो.व्यवस्थेची उतरंड वाईट असली तरी स्वतःची स्वप्नं गाडू द्यायची नाहीत ....आपण थांबायचं नाही ......ही अंत:प्रेरणा त्याला सतत जिवंत ठेवत असते . 
                                                                                 संवाद ...लेखकाचे मनोगत मधून.     

   
                                     पुस्तकाचे नाव : शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”
                                      लेखक :                      फारूक एस. काझी.
                                      प्रस्तावना :                     भाऊसाहेब चासकर.
                                      प्रकाशक:                               एकनाथ गुरव.
 “अंकुर” गट. सांगोला.
                                                   जिल्हा :                                      सोलापूर.
                                      किंमत:                                 १२०/- रु.     
                                     
 

Monday, 15 September 2014

मागे वळून पाहताना

आज जवळपास तीन महिन्यांनी मी माझा http://crcmardi.blogspot.in/ हा  ब्लॉग उघडून पाहतोय 
कारणही तसच आहे ...
परवा एका मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणाला की अरे तीन महिन्यापासून तू काहीही  पोस्ट केले नाहीस ब्लॉगवर...  मी दचकलोच कारण मलाही माहित नव्हते की मी तीन महिन्यापासून ब्लॉगवर पोस्ट करत नाही ते... 
मी त्याला म्हटल हल्ली वेळ मिळत नाही रे, शालार्थ, यशदा ट्रेनिंग, mscert ट्रेनिंग, आणि घरात करता असल्याने घरातील सर्व जबाबदारी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्यांच्यासाठी आहे ती माझी माझी शाळा आणि मुले....आणि तसही आता खूप सारे शैक्षणिक ब्लॉग सुरु झाले आहेत... माझ्यापेक्षाही चांगले आणि update असणारे...
काल आणखी एका मित्राचा फोन आला तो म्हणाला ठाऊक आहे फार व्याप वाढला आहे तुझा पण उद्या ब्लॉग ला  एक वर्ष पूर्ण होईल त्यानिमित्त लिही काहीतरी.... 
हा मला आणखी एक धक्का होता कारण बरीच मंडळी आपल्या ब्लॉग ला सतत भेट देत असतात हे यावरून सिद्ध होतं... मी त्याला प्रयत्न करतो म्हटल आणि फोन ठेवला... पण थोडा भूतकाळात डोकावलो खरच एक वर्षाचा काळ कसा निघून गेला कळले नाही 
मी गेल्या वर्षी १५ सप्टेंबर हा ब्लॉग चालू केला एक वेगळा प्रयोग, पहिला शैक्षणिक ब्लॉग, वेळ वाचवण्याचे तंत्र अश्या अनेक मथळ्याखाली अनेक वृत्तपत्रांनी या ब्लॉगची दाखल घेतली. यानंतर शैक्षणिक ब्लॉग तयार करण्यासाठी अनेक मित्रांनी पुढाकार घेतला आणि पाहता बरेच शाळांचे, केंद्रांचे, तालुक्यांचेही ब्लॉग तयार होऊ लागले..... आज  बघता बघता एक वर्ष झालं या एक वर्षाच्या काळात मागे वळून पाहत असताना बर्याच आंबट गोड आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या... 
या एक वर्षात, या ब्लॉगने मला व्यक्त व्हायला मदत केली. आजूबाजूला अनेक जण, अनेक नातेवाईक, मित्र मंडळी जरी असली तरी प्रत्येक वेळी ते सर्व "माझिया जातीचा" या सदरात मोडतातच असे नाही, त्यामुळे तो शोध तसा कायमच असतो. पण हा ब्लॉग माझी मनातलं काही सहज मांडायची गरज पूर्ण करतो. तशा अर्थाने ही माझी डायरीच... कोणालाही वाचायची परवानगी असलेली. त्यामुळे सुरुवातीला तो कोणी वाचतो की नाही याची मी फारशी दखल घेत नसे. पण नंतर लक्षात आले की माझ्या ओळखीतले अनेक जण तो वाचतात. प्रतिक्रिया पण देतात. कधी प्रत्यक्ष भेटीत, किंवा फोनवर आवर्जून तसं सांगतात ही.  अशा प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवतात हे मात्र खरं.
संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जापायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो.
या एका वर्षाच्या काळात मला ब्लॉग मुळे काय मिळाले असा विचार केला तर बरेच काही शिकायला मिळाले, अनेक चांगल्या व्यक्तींशी मी जोडला गेलो, अनेक चांगले मित्र मी कमावले, या ब्लॉगवरील माहिती चुकीची नसते हा विश्वास संपादन केला, flipkart.com या online शॉपिंग कंपनीची affiliate partnarship मिळाली, या ब्लॉग वरून आत्तापर्यंत २००००० पेक्षा जास्त किमतीची खरेदी झाली आहे...आणखीही बर्याच गोष्टी आहेत... खरे तर ब्लॉग ने  मला काय दिले हे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे... पण मला काहीतरी मिळाले आहे नक्की... खरच या क्षणी मागे वळून पाहताना अनेक भावना मनात उत्पन्न होत आहेत... सुबोध क्षेत्रे यांची कविता मला याठिकाणी आठवते...
“मला समोरच्या वाटेची,
भीती नाही.
त्यावर मी चालेल,
धडपडत कसाही.
पण भीती दाटते,
वाटेवरील वळणावर..
मागे वळून पाहताना,
थरारते सर्वांग !
खूप काही ठेऊन मागे,
शिदोरी प्रसंगांची!
छातीवर बाळगूनी घाव ओले.
निघलो अगम्याच्या,
अनंत शोधास.
टाकूनी मागे आठवनींचे,
भलेमोठे गाठोडे.
वाटत नाही मनापासून,
पलटावे पान मागले..
अनुभवलेले,वाचून झालेले.
नकोसा वाट्तो,
छातीवर बांधलेला पाषाणासम्
तो अघटीत भूतकाळ.
म्हणून घे हात माझा,
तुझ्या बळकट हातात.
धीर दे मला;
मागे वळून पाहताना….
पुढची वाट संपवण्यासाठी…!

हो... निरपेक्ष भावनेतून केलेल्या  या कामाच्या बदल्यात मला जे समाधान मिळाले त्याचे मूल्य पैशात कधीच व्यक्त होऊ शकत नाही... आज मागे वळून पाहताना समाधानाची ही भावना मला तृप्त करणारी आणि चिरकाल आनंद देणारी आहे असे वाटते....


Wednesday, 18 June 2014

एक चिंतन



      माणसाला परमेश्वराने सार काही दिल पण देताना मात्र त्याने कुणाला भरभरून सुख दिले.  कुणाच्या नशिबी अवहेलना, दु:ख प्रत्येक माणसाला घडविण्यामागे परमेश्वराचा चैतन्याचा काय उद्देश असेल संकटाच्या दरया पार करत आपल इच्छित धैर्य गाठण्यासाठी धडपडत, संघर्ष करत जीवन जगत असतो, तर कुणी नशिबाच्या साथीने यशाचे शिखर गाठतो.
      प्रत्येक जण जगत असतो.  प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो.  प्रत्येकाच्या मागे प्रेरणा असते.  हा  परमेश्वर नावाचा बहुरूपी मात्र आपल्या सगळ्यांना त्याच्या इशा-यावर नाचवतो.  त्याच्या मनात पुढच काय आहे हे कुणालाच ठाऊक नसत.  अद्यापपर्यंत त्याचा कोणीच शोध लावू शकला नाही.
      विज्ञानाने मानवाने अनेक शोध लावले पण त्याचा शोध मात्र कोणालाही लागला नाही.  नाहीतर आपण अनेक नैसर्गिक संकटाना थोपवू शकलो नसतो का?  कर्ता करविता तो आहे.  सर्व काही त्याच्याच हातात आहे.  आपण फक्त कटपुतली प्रमाणे त्याचा इशा-यावर नाचत असतो.  देव कसा आहे?  कोठे आहे?  तो काय करतो?  किवा काय करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही.  म्हणजे त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही.  ईश्वर महान आहे.  ज्याप्रमाणे एखाद्या महासागराकडे पहिले असता त्याची सीमा कुठपर्यंत आहे हे लक्षात येत नाही जिकडे नजर फिरवावी तितके ते लांब वाटते किवा क्षितिजाकडे पाहिल्यानंतर कसे भासते कोठेतरी ते क्षितीज टेकले आहे.  पण तसे नसते.  ते आपल्याला तसे भासते.  कारण हे सगळ आपल्या विचारा पलीकडच आहे.
(गंगा सालगुडे)

आजचा सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

आजचा दिनविशेष

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन १८५८

राणी लक्ष्मीबाई
टोपणनाव: मनू
जन्म: नोव्हेंबर १९, इ.स.१८३५
काशी, भारत
मृत्यू: जून १८, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर

आजची बोधकथा

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांगमी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते! 

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

Tuesday, 17 June 2014

शाळा प्रवेशोत्सव

जि. प. प्राथ. शाळा माळवाडी (वरकुटे-म्हसवड) येथे आज शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, ग्रा.प.सदस्य, पालक, ग्रामस्थ यांचे  उपस्थितीत शिक्षण प्रवेशोत्सव साजरा करणेत आला. यावेळी नवागतांचे स्वागत, गुढीपूजन, प्रभातफेरी, पुस्तकवाटप, उपस्थिती प्रतिज्ञा, हळदी कुंकू आदि कार्यक्रम घेणेत आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.छाया किसन खरात, उपाध्यक्षा सौ. अर्चना किसन निकम, सदस्य शंकर नामदेव दोलताडे, सदस्या विमल बाबुराव गायकवाड, मंगल नारायण वाघमारे, आनंदीबाई शिवाजी जाधव, सुभाष जाधव, नवनाथ बबन जाधव...इ पालकांच्याउपस्थितीत नवागतांचे स्वागत तसेच गुढीपूजन व पाठ्यपुस्तकांचे वाटप, करण्यात आले.
या कार्यक्रमाचे फोटो : 

आजचा सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आजचा दिनविशेष

गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी
 
गोपाळ गणेश आगरकर  (१८५६-१८९५) -
 महाराष्ट्रीय लेखक व समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म सन १८५६ सालीं झाला.  गृहस्थिति अगदीं गरिबीची असल्यामुळें आपल्या आप्तांच्या आश्रयानेंच यांनीं रत्नागिरीस व वऱ्हाडांत विद्याभ्यास केला. सन १८७५ सालीं म्याट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन हे डेक्कन कॉलेजांत आले.

आजची बोधकथा

एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी त्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच लाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"


तात्पर्य- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.