Monday 28 October 2013

आजचा सुविचार

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

आजची बोधकथा

एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत!मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे." यमदुताने त्याला म्हटले,"राजन!प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेंव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, " ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिवून अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.

तात्पर्य - 

 
लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.