Wednesday 23 October 2013


आजचा सुविचार

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

आजची बोधकथा

एका संताच्या आश्रमात शेकडो गाई होत्या. त्या गाईच्या उत्पन्नातून ते आश्रम चालवीत असत. एकेदिवशी एक शिष्य म्हणाला,"गुरुजी! आश्रमाच्या दुधात दररोज पाणी मिसळण्यात येत आहे." संताने ते रोखण्यासाठी त्याला उपाय विचारला तेंव्हा तो म्हणाला, "एक कामगार ठेवू, तो दुधाची देखरेख करेल," संताने ते मान्य केले. दुसऱ्याच दिवशी कामगार नेमण्यात आला. तीन दिवसानंतर तोच शिष्य येवून संताला म्हणाला,"या कामगाराची नियुक्ती केल्यापासून दुधात जास्तच पाणी मिसळले जात आहे." संताने म्हटले,"आणखी एका व्यक्तीची नियुक्ती करा तो पहिल्या कामगारावर लक्ष ठेवेल" आणि तसेच करण्यात आले. परंतु दोन दिवसानंतर आश्रमात गोंधळ उडाला, सर्व शिष्य संताकडे येवून म्हणाले,"आज दुधात पाणी तर होतेच पण त्याबरोबर एक मासाही आढळून आला," तेंव्हा संत म्हणाले," तुम्ही भेसळ रोखण्यासाठी जितके कामगार ठेवलं तितकी भेसळ जास्त होईल. कारण प्रथम या अनैतिक कामात कमी कामगारांचा सहभाग असतो तेंव्हा पाणी कमी असते, एक कामगार वाढल्याने त्याचा हिस्सा ठेवून पाणी अधिक मिसळले जावू लागले, इतके पाणी मिसल्यावर त्यात मासा नाही तर लोणी येईल." तेंव्हा शिष्यांनी यावर उपाय विचारला तेंव्हा संत म्हणाले,"यासाठी त्यांची कामावर निष्ठा वाढवावी लागेल तर ते काम प्रामाणिकपणे करतील."

तात्पर्य- 

प्रतिबंध लावण्याऐवजी मार्गदर्शन केल्याने, विचार बदलल्याने व्यक्ती कुमार्ग सोडून सन्मार्ग धरतील.