Sunday 20 October 2013

आजचा सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
 

आजची बोधकथा

एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एकेदिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?" हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप देताल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. 


तात्पर्य- 

प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे.