Sunday 27 October 2013

आजचा सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

आजची बोधकथा

दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.

तात्पर्य -

जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव हि आयुष्यात,घरात येते.